औक्षणाचे हिंदू धर्मातील महत्व


आपण हिंदू धर्मीय लोक सहिष्णू असतो. धार्मिक असतो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा-रिवाज नेमाने पाळतो.

        आपल्या धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे. मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे.

        संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणणं असो, किंवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा लावला जातो. एखादी शुभवार्ता समजली, की देवापुढं दिवा लावून साखर ठेवली जाते.

        देवाची नित्यपूजा झाल्यानंतर निरांजनाने ओवाळून उदबत्ती, कापूर लावला जातो. एखादं मूल जन्माला आलं, की अकराव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण करण्यात येतं. नामकरण करताना पाळण्याचीही पूजा केली जाते. मग बाळाला आईला औक्षण केलं जातं.‌ नंतर जावळ काढणं असो, वाढदिवस साजरा करत असताना औक्षण असतंच असतं. अगदी कोणत्याही शुभप्रसंगी औक्षण करतात. हे औक्षण करण्यामागील उद्देश काय आहे ?


औक्षणाचा अध्यात्मिक अर्थ

        औक्षण म्हणजे दिवा लावून देवाला अथवा व्यक्तीला ओवाळणे. त्यातही दोन‌ प्रकार औक्षण केले जाते. तेलवातीचे औक्षण व फुलवातीचे औक्षण. म्हणजेच निरांजनात दोन प्रकारच्या वाती असतात.

१. तेलवात, २ फुलवात.

१. तेलवातीचे औक्षण-

        यातील तेलवात ही सर्वसाधारण सगळ्या औक्षणासाठी वापरली जाते. निरांजनात कापसाच्या वाती व तेल घालून त्यात तयार केलेल्या वातीला तेलवात असे म्हणतात.  या वाती सम प्रमाणातच ठेवल्या जातात. दोन किंवा चार. एक तीन‌ अशा विषम संख्या वातीत घेत नाहीत.

२. फुलवातीचे औक्षण-

        फुलवात ही कापसाला फुल आणि देठाचा आकार देऊन करतात. व तुपात भिजवून ठेवतात. निरांजनात तूप घालून ही वात प्रज्ज्वलित केली जाते. केवळ देवाचे औक्षण करण्यासाठी किंवा देवाची आरती करतानाच फुलवातीचे निरांजन वापरतात. त्याला फुलवातीचे औक्षण म्हणतात. देवासमोर किंवा ताम्हणात ठेवून प्रज्वलीत केलेला दिवा हा धरणीवरील दिव्य आणि तेजस्वी स्वागताचे प्रतिक आहे.
        थोडक्यात सांगायचे तर, ही मानवाने ईश्वरासमोर, त्याच्या दैवी तेजासमोर मानलेली, स्वीकारलेली शरणागती आहे.

        औक्षण सुचविते, की कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या अध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दिपज्योती क्रियाशील करतात. म्हणूनच हे औक्षण केले जाते.

या औक्षणाचे एक महत्त्व आहे जे आपल्याला शास्त्राने‌ सांगितले आहे.



औक्षणाचे महत्व

        औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात.

        व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात. म्हणजेच अग्नीतत्वात या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकायचं काम या औक्षणाची प्रज्ज्वलित केलेली निरांजने करतात.

        देवांचा आशीर्वाद मिळवण्यास हे औक्षण सहाय्य करते. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून, सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते.

        औक्षण करीत असताना व्यक्तीला स्वतंत्रपणे अध्यात्मिक विकास व सर्वदा शरणागती पत्करल्यामुळे पाहिजे ते यश त्याला मिळत जाते. देवांचा आशीर्वाद सहज मिळतो.

औक्षण कोणाचे करावे ?

        लहान बाळ, गुणी व्यक्ती, युद्धावर जाणारे सैनिक, देव, संत, महात्मे, पवित्र झाडे इत्यादीचे औक्षण करावे. पुरुष, पवित्र झाडे, महान कार्य करणाऱ्या स्त्रिया, पुरुष,नवजात बालके, भाऊ, नवदांपत्य यांचे औक्षण करावे.
तसेच कोणताही सण,समारंभ इत्यादी वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यात आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू असतो.

औक्षण कोठे करावे ?

        औक्षण करीत असताना देवासमोर पाट अथवा चौरंग मांडून, सभोवार रांगोळी घालून त्यावर व्यक्तीला बसविले जाते. लग्न, मुंजीत औक्षणाचा सोहळा मंडपात केला जातो. उंबरठ्यावर औक्षण केले जात नाही, ते घरातच केले जाते. उंबरा हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. जो वाईट गोष्टी दाराबाहेर ठेवतो व चांगल्या गोष्टींचे घरात स्वागत, संरक्षण करतो.

        एखादी व्यक्ती जेव्हा घराच्या चौकटीत उभी असते तेव्हा रज, तम विचार त्याच्या डोक्यात चालू होतात, त्यामुळे ही आपदा दाराबाहेर रहावी, त्यापासून त्याचे घरातील लोकांचे संरक्षण व्हावे अशी त्याची इच्छा असते.

        राजस तामस विचारांचा पगडा व्यक्तीच्या मनावर रहातो व तो गोंधळून जातो. म्हणून उंबऱ्यावर औक्षण अमान्य आहे.

        घरातील मंदिरासमोर स्वस्तिक काढून त्यावर पाट ठेवून सभोवती रांगोळी काढावी, त्यावर व्यक्तीला बसवून औक्षण करावे. हे केले, की मनात देवभक्ती उदय पावून परमेश्वराचा चैतन्य भाव जाणवू लागतो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होऊन अपेक्षित फायदा होऊन जबरदस्त आशीर्वाद प्राप्त होतो.


बघा, औक्षण करण्यापूर्वी मंगल तिलक लागलेला निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला चेहरा किती तेजस्वी वाटतो. त्याचं कारणच ज्योतींचे तेज आणि शक्तीचा आशीर्वाद!!!

        एखाद्या व्यक्तीला द्दष्ट लागली म्हणतात म्हणजे नकारात्मक, वाईट शक्तींचा होणारा वावर किंवा त्रास. तो कमी व्हावा किंवा नाहीसा व्हावा यासाठी दृष्ट काढली जाते. म्हणजे ती काढताना मीठ, मोहऱ्या, लाल मिरच्या, नारळ उतरवून उंबऱ्याबाहेर फोडतात. म्हणजे ही नकारात्मक शक्ती उंबऱ्याबाहेर जाऊदे. थोडक्यात, उंबरा ही नकारात्मक उर्जा दूर ठेवणारी जागा मानली जाते.

औक्षण साहित्य

        औक्षणाच्या ताम्हणात हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी,अंगठी व तेलाचे/तूपाचे दोन निरांजन दोन दोन वाती घालून ठेवावेत. या प्रकारे औक्षण करत असताना, प्रथम कपाळावर कुंकुम तिलक लावला जातो.

        त्यानंतर डोक्यावर अक्षता टाकून प्रज्वलित निरांजनाने ओवाळतात. नंतर हातात सुपारी दिली जाते. व परत एकदा ओवाळले जाते. हे औक्षण केले की सुपारी पुन्हा तबकात किंवा ताम्हणात ठेवली जाते.

        औक्षण करत असताना दिशांचेही भान ठेवावे लागते. पूर्व पश्चिम बसवूनच औक्षण करावे असे सांगितले जाते. दक्षिणेकडे तोंड करुन औक्षण करणे निषिद्ध मानले जाते.

        केवळ मृत्यू प्रसंगीच दक्षिणेकडे तोंड करुन मृतदेहाचे औक्षण केले जाते.


        म्हणजेच एकंदरीत सर्व प्रसंगी केले जाणारे औक्षण करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. फक्त आंधळेपणाने पाडलेला रिवाज नाही.

No comments:

Post a Comment