एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती क्षेत्रांचे ज्ञान आत्मसात करून त्यात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो हे आपल्याला पाहायचे असल्यास लोकमान्य टिळकांचा अभ्यास करावा.
लोकमान्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आणि कल्याणासाठी वेचले. हे करण्यासाठी त्यांना ज्या ज्या क्षेत्रांचा अभ्यास करणे आवश्यक वाटले ते सर्व करून देशहित साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
लोकमान्य टिळक आणि स्वराज्य…
ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी करणारे लोकमान्य टिळक हे एक प्रमुख नेते होते. मात्र अनेकांना टिळकांची स्वराज्याची मागणी नक्की काय होती याबद्दल द्विधा आहे.
लोकमान्यांची स्वराज्याची मागणी म्हणजे आमचा राज्यकारभार आमच्या हाती द्या अशीच होती. टिळकांनी मागितलेले स्वराज्य म्हणजे ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ नव्हते ही बाब खरी आहे.
मात्र ती मागणी म्हणजे केवळ ते म्युनिसिपालिट्या आणि प्रांतिक सरकारांसाठी अधिकार मागत होते हे मात्र खरे नाही.

